Wednesday, 23 April 2014

साईबाबा

Saibaba


   श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.  


     औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.

     ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा  उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.

     फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले.

     ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा.

     बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.''

     बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत.

     ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.

     बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले.

     आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.

     बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.    
   
     पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे !

शिर्डीस ज्याचे लागतील पाय l
टळती अपाय सर्व त्याचे ll
माझ्या समाधीची पायरी चढेल
दुःख हे हरेल सर्व त्याचे ll 

संत नामदेव

॥ भक्तश्रेष्ठ संत नामदेव ॥

येत्या सोमवारी संत नामदेवांची पुण्यतिथी. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले.


 भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज हे नामवेदाचे साक्षात प्रकट रूप होते. मराठी भाषेतील ते पहिले चरित्रकार होते. ज्ञानदेवांचे समकालीन असणार्‍या नामदेवांनी ज्ञानदेवांचे चरित्र दोनशे पंचवीस अभंगांतून फुलातल्या गंधासारखे उलगडले, म्हणून ज्ञानदेवांचे अलौकिक आयुष्य ज्ञात झाले. ज्ञानदेवादी चारही भावंडांच्या समाधीचे वर्णन नामदेव महाराजांनी केले आणि या लोकोत्तर भावंडांचे आयुष्य किती विलक्षण होते हे केवळ नामदेव महाराजांमुळे कळले. नामदेवांनी आत्मपर अभंगातून आपल्या प्रदीर्घ आयुष्याचा पट उलगडला. पांडुरंगाला प्रत्यक्ष घास भरवणारे नामदेव महाराज हे भक्ती क्षेत्रातील अलौकिक कोडे होते. भागवत धर्माची पताका गंगा आणि सिंधूच्या प्रदेशात फडकवत ठेवणारे नामदेव महाराज पंजाबी आणि शीख समाजाच्या गळ्यातले ताईत झाले. कारण त्यांनी हिंदी भाषेत अभंग लिहिले. हिंदी भाषेत अभंग लिहिणारे ते पहिले मराठी संत होते. पंजाबी लोकांच्या हृदयगाभार्‍यात श्रीविठ्ठलाचे चरण उमटवणारे नामदेव महाराज म्हणजे आश्चर्यालाच आश्‍चर्य वाटावे असे लोकोत्तर संत होते.
श्रीविठ्ठलाच्या सगुण भक्तीत आयुष्यभर रममाण झालेल्या नामदेव महाराजांचा कालखंड आहे १२७०-१३५०. नामदेवांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ म्हणजेच २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला आणि आषाढ त्रयोदशी शके १२७२ म्हणजेच ३ जुलै १३५० मध्ये पंढरपुरात समाधीस्थ झाले. नामदेव महाराज म्हणतात,
मरोनि जन्मावें पंढरीचें पारी ।
व्हावें महाद्वारीं कृमिकीटक ॥
संतचरणरज लागे येतां जातां ।
नामा म्हणे आतां हेचि व्हावे ॥
नामदेव महाराजांच्या मनातला हा विचार त्यांच्या सर्वच भक्तांनी त्यांच्या अस्थी राऊळाच्या महाद्वाराशी पुरून तिथेच ‘पायरी’रूपाने महाराजांची समाधी चिरंतन केली. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘नामदेवांची पायरी’ आजही वारकरी मंडळी अत्यंत आदराने आणि भक्तिप्रेमाने पुजतात. ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य महाराजांना लाभले.
नामप्रेमाचा जिव्हाळा हाच विठ्ठलभक्तीचा गाभा आहे. ‘एका नामे हरिजोडे’ ही महाराजांची भूमिका होती. नाम हेच कर्म आहे आणि नाम हेच ब्रह्म आहे हे नामदेव महाराजांचे सर्वांना स्वानुभवाधिष्ठित सांगणे होते. वारकरी संप्रदायाचा श्रीविठ्ठलभक्तीचा प्रसार नामदेव महाराजांनी अथकपणे केला. उत्तरेच्या दिशेने झेपावलेले नामदेव हे खरे तर भक्तिविश्‍वातले फार मोठे कोडे होते. आपल्या आयुष्यातली शेवटची वीस वर्षे नामदेव महाराजांनी उत्तरेकडील पंजाबात काढली आणि विठ्ठलभक्तीच्या सतारी हिंदी अभंगातून झंकारत ठेवल्या. नामदेव गाथेत महाराजांच्या दोनशे तीस हिंदी अभंगांचा समावेश केलेला आहे. शिखांच्या आदिग्रंथात म्हणजेच ‘गुरुग्रंथसाहेबा’त एकसष्ट अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासंबंधीची तपशीलवार माहिती गुरुमुखीत प्रसिद्ध झालेल्या पुरणदासकृत ‘जनमसाखी’त पाहायला मिळते. ग्रंथसाहेबातील हे एकसष्ट अभंग ‘संत नामदेव की गुरुबानी’ म्हणून प्रसिद्ध तर आहेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे शीख धर्मीयांच्या नित्य पठणात ही पदे आहेत. शिखांच्या अंत:करणात नामदेवांविषयी विलक्षण आदर आहे. पंजाबमधील घुमान गावी नामदेव महाराजांचे मंदिर जे आहे ते पंजाबी आणि शिखांच्या नामदेवप्रेमाचे मूर्त साकार रूप आहे. मुसलमानांचे आक्रमण झालेले असताना शेकडो कोस दूर असणार्‍या पंजाबात वयाच्या साठीनंतर नामदेव महाराज गेले कसे? हेच सर्वात मोठे आश्‍चर्य आहे. विशेष म्हणजे उत्तरेकडील भाषा वेगळी, संस्कृती वेगळी. परंतु महाराजांनी ती आत्मसात केली. हिंदी भाषेवर वर्चस्व मिळवून अभंगरचना हिंदीमधून केली. त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त झाला की, पंजाबी संस्कृतीने महाराजांची ‘मुखबानी’ आपल्या हृदयात नंदादीपासारखी शांत तेवत ठेवली. संत कबीराने महाराजांविषयी म्हटले की,
दख्खन म्याने नामा दरजी उनोका बंदा विठ्ठल है।
और सेवा कछु नहि जाने अंदर बाहर केशव है ॥
तेराव्या - चौदाव्या शतकात दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना नामदेव महाराज चालत चालत उत्तरेकडे गेले ती खांद्यावर विठ्ठलभक्तीची पताका घेऊनच. भक्तिप्रसादाचे कार्य करताना विठ्ठलाच्या नामात महाराज तर आपले संपूर्ण अस्तित्व पार विसरूनच गेले होते. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले. आपले सद्गुरू श्री विसोबा खेचर यांच्याकडून नामदेव महाराजांना अद्वैतबोधाची दीक्षा मिळाली आणि महाराजांच्या आयुष्याला सर्वांभूती श्रीविठ्ठल दर्शनाचे अप्रतिम वळण मिळाले. ज्ञानदेवांच्या सहवासात तर ज्ञानोत्तर भक्तीची अपूर्व अमृतचव महाराजांनी प्रत्यक्ष चाखली. त्याचा परिणाम म्हणजे महाराज म्हणू लागले-
घालीन लोटांगण वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन आनंदें पुजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥
ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या नामदेव महाराजांनी विठ्ठलनामाची शाश्वत सुगंध लाभलेली अमृतफुले आयुष्यभर पांडुरंगावर उधळली आणि आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ या दिवशी पंढरपुरातल्या विठ्ठल राऊळाच्या महाद्वाराशीच विठुरायाच्या गजरात आपला शेवटचा भारलेला श्वास सोडला.


- वामन देशपांडे

निवृत्तिनाथ


संत ज्ञानेश्वर हे त्यांचे धाकटे भाऊ. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

गैनीनाथ वा ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच.निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.

ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.

संत गोरोबा कुंभार


संत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपैकी ‘कोणाचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा’ याचा निर्णय करण्याचा आध्यात्मिक अधिकार असलेले, सर्वार्थाने ज्येष्ठ - गोरोबाकाका!


गोरा कुंभार हे आध्यत्मिकदृष्ट्या संतपदाला पोहोचलेले होते, तसेच ते संत कवीही होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते अनन्यसाधारण भक्त होते. गोराबा हे संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यांना सर्व जण गोरोबाकाका म्हणत असत. त्यांचे गाव मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबादजवळील तेर-ढोकी (या गावास सत्यपुरी किंवा  तेरणा असेही म्हणतात) हे होय. गोरोबाकाका प्रापंचिक असूनही विरक्तच राहिले. त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता, पारमार्थिक क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला गेला. संत ज्ञानेश्र्वर-नामदेव यांच्या समकालीन असलेल्या गोरोबांचे जन्मवर्ष इ. स. १२६७ मानले जाते.

श्री विठ्ठलाचे स्मरण सतत त्यांच्या मुखात असे. त्यांना नामस्मरणापुढे कशाचेच भान उरत नसे. त्यांच्या भक्तिरसात बुडून जाण्याबाबतची पुढील कथा सांगितली जाते.

एकदा त्यांची पत्नी पाणी आणावयास म्हणून बाहेर गेली होती. तिने त्यांना आपल्या तान्ह्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. गोरोबाकाका उन्मनी अवस्थेत गाडगी, मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडवून चिखल करीत होते. त्यांचे ते तान्हे लेकरू चिखल करताना पायाखाली तुडविले गेले, तरी त्यांना भान नव्हते. पत्नी पाणी घेऊन आल्यावर पाहते, तर तिचे मूल गतप्राण झालेले होते. तिने हंबरडा फोडल्यावर गोरोबाकाका शुद्धीवर आले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोरोबांना वाटले आपण काय करून बसलो. अतिशय मनस्वी पश्र्चातापात ते दग्ध झाले. पण काही काळानंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले आणि त्यांच्या पत्नीस परत मिळाले. यानंतर त्यांची पत्नीही विठ्ठलभक्त झाली.

(या घटनेवर आपला विश्र्वास बसत नाही. पण गोरोबाकाकांचे कोणतेही लिखित चरित्र उपलब्ध नाही. २-३ प्रसंग मौखिक परंपरेतून चालत आले आहेत. या प्रसंगांवरून त्यांच्या अमर्याद भक्तीची  व त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची कल्पना आपल्याला येते एवढे निश्र्चित.)
संत गोरोबांकडे तेर-ढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी ‘कोणाचे मडके (डोके) किती पक्के’ अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली होती, असाही प्रसंग सांगितला जातो.

संत गोरोबांची उपलब्ध काव्यरचना अत्यल्प आहे. त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत. त्यांची काही पदरचना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथील बाडात सापडते. गोरोबा हे साक्षात्कारी संत होते.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे। तव झालो प्रसंगी गुणातीत।।
अशा त्यांच्या अभंगांत अद्वैत साक्षात्काराचीच अनुभूती केवळ प्रकट झालेली दिसते. ‘म्हणे गोरा कुंभार’ ही त्यांची नाममुद्रा होय.
संत ज्ञानेश्र्वरांनी प्रतिपादिलेला ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग संत गोरोबांनी स्वीकारलेला दिसतो. प्रपंच करत परमार्थ साधता येतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे संत गोरोबाकाका! त्यांची समाधी तेर गावी आहे. हे गाव सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असून लातूरपासूनही जवळ आहे.

संत तुकाराम


संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.


तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

सावता माळी


कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती.


अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योगर्याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.
‘‘योगर्याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्र्वर भेटतो.
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.
त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणु या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
सावता माळी (जन्म:इ.स. १२५० समाधी १२९५ नामदेवाच्या प्रभावळीत महत्वपूर्ण मराठी संत सावता माळी या नावातच त्यांची व्यवसायबद्ध असलेली जात लक्षात येते.(संत ज्ञानेश्र्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदि पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळ्याचे २५ अभंग उपलब्ध आहेत. सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून् ठेवत असे.

बहिणाबाईं

संत कवी बहिणाबाईं

एक थोर मराठी स्त्री संत व कवी.
स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल.
बहिणाबाईंचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, वैजापूर तालुक्‍यातील देवगांव (रंगार्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटुम्बात लावला.


संत बहिणाबाईना लहानपणापासुनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीतने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरूषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होवून परमार्थीक वृत्ती वाढत गेली. घरची गरीबी,शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वॄत्ती व संतवृत्तीला साजेशी पाण्डुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे.
पुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग म्‍हणू लागली व तुकोबाचे दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आर्शिवाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्‍यांचे ध्‍यान करू लागली शेवटी कार्तिक व. ५ शके १५६९ रोजी तुकोबारायानी स्‍वप्‍नात येवून गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.
त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ सन्त, सन्तचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते सन्तकवी दासगणू महाराज लिहितात .. पहा केवढा अधिकार .. ऋणि तिचा परमेश्वर ... या साध्वीची समाधी 'शेऊर' या गावी आहे.
चमत्कार
असे सांगतात की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा: नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतू पाण्डुरंगाच्या भेटीची केवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवधी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगिन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यन्त ते झाड हीव भरल्यामुळे थड्थड हालत होते.

संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! , या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच. सम्पूर्ण अभंग असा -
संत कृपा झाली इमारत फळा आली |
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार |
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |
तुका झालासे कळस भजन करा सावकाश |
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.||