Wednesday, 23 April 2014

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे / Shivshahir Babasahaeb Purandare


शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर !

सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. ‘इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे’ असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी शिवचरित्र हे एकमेव जीवितध्येय साकार केले अशी विभूती म्हणजेच मराठी इतिहासाचे भाष्यकार, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे.

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत ८०० हून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.

भूतकाळाचा अर्थ उमगून इतिहासाच्या अभिमानासह आजच्या पिढीला वैभवशाली भविष्याकडे नेण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आत्तापर्यंतचे आयुष्य वाहिले आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. आजही (वयाच्या ८६ व्या वर्षी) बाबासाहेब तितक्याच उत्साहाने, समरसतेने कार्यरत आहेत.

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक / Lokmany TIlak


टिळक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी होती. वडील गंगाधरपंतयांच्याकडून त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. संस्कृतमधील एक श्लोक पाठ केल्यामुळे त्यांना एक पैमिळत असे. त्यांनी अशा किमान २०० पाया मिळवल्या. शाळेत जायला प्रारंभ होण्यापूर्वीच अनेकगोष्टी त्यांच्या तोंडपाठ असायच्या. त्यांचे पाठांतर पाहून त्यांच्या गुरुजींनाही फारच नवल वाटतअसे.


एके दिवशी वर्गात गुरुजींनी शुद्धलेखन घातले. त्यात 'संत' हा शद्ब एकापेक्षा अधिक वेळा आला होता.टिळकांनी तो तीन वेगवेगळया पद्धतीने लिहिला. संत, सन्त आणि सनत. गुरुजींनी पहिला शब्दयोग्य ठरवला आणि बाकी दोन चूक दिले. आपण लिहिलेले तीनही शब्द योग्य आहेत, असे त्यांनीगुरुजींना सांगितले. एवढेच नव्हे, तर ठामपणे आपले म्हणणे योग्य कसे आहे, ते उदाहरणासहितपटवून दिले. तेव्हा शिक्षकांनी त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले.
टिळकांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असतांना एक वर्ष परीक्षेला न बसता केवळ व्यायामाचासराव करून आपली शरीरयष्टी बळकट केली. ते उत्तम मल्ल आणि पट्टीचे पोहणारेही होते. शाळेतजात असल्यापासून आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आहे, आपले नव्हे, याची टिळकांना जाणीवहोती. शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न चालूकेले. बालपणापासून त्यांच्या अंगी असलेले सारे गुण त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देतांनाउपयोगी पडले. सुदृढ शरीरस्वास्थ्यामुळे पुढे कारागृहातील हालाखीच्या आणि राजकीयधकाधकीच्या आयुष्यातील कष्ट ते सोसू शकले. मंडालेच्या कारागृहात 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लेखनकेले.
आपली सत्य बाजू पटवून देण्याच्या त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या बाणेदार वृत्तीमुळे ते हिंदुस्तानवरअन्याय करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू शकले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकहे भारताचे एक आदर्श सुपुत्र म्हणून ओळखले गेले.

या गोष्टीतून आपल्याला टिळकांचा बाणेदारपणा दिसून येतो. तसेच कुठचेही कार्य करायचे म्हटलेकी, शरीरयष्टी चांगली हवी. त्यासाठी प्रतिदिन व्यायाम करायला पाहिजे. शरीर बलवान असेल,तरच आपण कुठलीही क्रांती करू शकतो. सध्या अपले राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती चांगली नाही.तेव्हा इतरांशी लढा द्यायचा असेल, तर शारीरिक आणि त्यासह आध्यात्मिक बळही हवे. तेव्हानामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांसह लढा द्यायला सिद्ध होऊया

स्वातंत्र्यवीर - सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

vinayak damodar sawarkar


'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते 'आचार्य प्रह्लद केशव' अत्रे यांनी दिली.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना 'बाबाराव' हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत
बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच
ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते.

त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव
भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध 'अनंत कान्हेरे' या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे
सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज
इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या
ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून
ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली
नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू
राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन
महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या
भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ
साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्‍नागिरीत केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला
जातिव्यवस्था, चातुर्वर्ण आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि
त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व
तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा,
सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.

१९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

सावरकर साहित्य :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार,
जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-र्‍यांचा
लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
सावरकरांचे पहिले काम म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी
त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत
रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी.
शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट
विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने
आहेत.सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला.
सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य,
वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण,
सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.


ग्रंथ आणि पुस्तके :
वीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात
-
अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.


इतिहास : 
१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून
तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जोडला)भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही


कथा : 
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २

नाटके : 
संगीत उ:शाप
संगीत संन्यस्त खड्‌ग
संगीत उत्तरक्रिया
बोधिसत्व- (अपूर्ण)

कविता :

महाकाव्ये : 
कमला
गोमांतक
विरहोच्छ्वास
सप्तर्षी
स्फुट काव्य
सावरकरांच्या कविता

जन्म: -       मे २८, १८८३ 
जन्म स्थळ -  भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: -       फेब्रुवारी २६, १९६६ भारत
चळवळ:     भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:     अभिनव भारत हिंदू महासभा
धर्म:           हिंदू
वडील:        दामोदर सावरकर
पत्नी:         यमुनाबाई विनायक सावरकर

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी / Samarth Ramdas Swami


समर्थ रामदास (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील महान संत, कवी व समर्थ संप्रदायाचे उद्गाते होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणा~या शिवाजी महाराजांनी अनेक साधू-संतांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरु-शिष्य नाते वेगळेच मानावे लागेल.

जीवन

बालपण
श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि. जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्यादिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुध्दिमान,निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.
[]तपश्चर्या आणि साधना
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. 'समान-शिले-व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.
[]जीवनकार्य
आत्म-साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.
सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.
विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसुर मारुती (ता. कराड) (८)बहे-बोरगांव (क्रुष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).
दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढेसज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.
[]व्यक्तिमत्व

मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगुळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपायची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, कांखेस झोळी, अशा थाटांत समर्थांची रूबाबदार आणि दुस-यावर छाप पाडणारी मूर्ति संचार करीत असे. समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नान-संध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्तम पारख होती. ते स्वत:उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोक-स्थितीचे उत्तम ज्ञान होत, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.
बहुतेक संतांना मानवी गुरू आहेत. समर्थांना मानवी गुरू नाही. स्वतः श्रीरामाने त्यांना राममंत्राचा अनुग्रह दिला अशी श्रद्धा आहे. ते स्वयं-प्रज्ञ होते. आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांनी स्वत:च ठरविले, आणि ते साध्य करण्यासाठी मार्गही स्वत:च शोधला. समाजाविषयी अपार तळमळ, करूणा, हीच त्यांची प्रेरणा होती. धर्म-संस्थापना हेच त्यांचे कार्य होते.
“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।”
हा त्याच्याबद्द्लचा श्लोक सार्थच आहे.
साहित्य व काव्यनिर्मिती

समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङमय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती.दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत. `श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.
समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्म-विश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती, हे त्यांच्या पुढील कांही वचनांवरून दिसून येइल.
समर्थ म्हणतात -
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||
३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||
४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||
५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||
७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||
८. आधी केलें | मग सांगितलें ||
९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे ||
१०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||
एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ दोन शव्दांत सांगतां येते - प्रयत्न व सावधानता.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले - जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की - प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।। समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात. परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात, बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी। चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।। मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये। ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।। लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली। ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी। तैसी भाषा प्राकृत।।’
असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये. विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.


                  बोधामृत
मनाचे श्लोक- एकूण २०५ मनाचे श्लोक आहेत.
दासबोध
छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र
मारुति स्तोत्र
करुणाष्टके

समर्थसंप्रदाय

समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरून धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
शिष्यमंडळ
कल्याण स्वामी.
उध्दव स्वामी
भीम स्वामी
दिनकर स्वामी
केशव स्वामी
हणमंत स्वामी
रघुनाथ स्वामी
रंगनाथ स्वामी
भोळाराम
वेणा बाई
आक्का बाई
दिवाकर स्वामी
गिरिधर स्वामी

संत ज्ञानेश्वर


संत श्री ज्ञानेश्वर
‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
                                                                           - श्रीस्वरूपानंद स्वामी

संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न!  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर!  गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!


ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’
`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.

‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.

श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.  सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,
‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।   एक तरी ओवी अनुभवावी।।’

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!

`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली  (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -
                  ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
                   वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’

साईबाबा

Saibaba


   श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.  


     औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.

     ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा  उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.

     फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले.

     ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा.

     बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.''

     बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत.

     ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.

     बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले.

     आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.

     बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.    
   
     पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे !

शिर्डीस ज्याचे लागतील पाय l
टळती अपाय सर्व त्याचे ll
माझ्या समाधीची पायरी चढेल
दुःख हे हरेल सर्व त्याचे ll 

संत नामदेव

॥ भक्तश्रेष्ठ संत नामदेव ॥

येत्या सोमवारी संत नामदेवांची पुण्यतिथी. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले.


 भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज हे नामवेदाचे साक्षात प्रकट रूप होते. मराठी भाषेतील ते पहिले चरित्रकार होते. ज्ञानदेवांचे समकालीन असणार्‍या नामदेवांनी ज्ञानदेवांचे चरित्र दोनशे पंचवीस अभंगांतून फुलातल्या गंधासारखे उलगडले, म्हणून ज्ञानदेवांचे अलौकिक आयुष्य ज्ञात झाले. ज्ञानदेवादी चारही भावंडांच्या समाधीचे वर्णन नामदेव महाराजांनी केले आणि या लोकोत्तर भावंडांचे आयुष्य किती विलक्षण होते हे केवळ नामदेव महाराजांमुळे कळले. नामदेवांनी आत्मपर अभंगातून आपल्या प्रदीर्घ आयुष्याचा पट उलगडला. पांडुरंगाला प्रत्यक्ष घास भरवणारे नामदेव महाराज हे भक्ती क्षेत्रातील अलौकिक कोडे होते. भागवत धर्माची पताका गंगा आणि सिंधूच्या प्रदेशात फडकवत ठेवणारे नामदेव महाराज पंजाबी आणि शीख समाजाच्या गळ्यातले ताईत झाले. कारण त्यांनी हिंदी भाषेत अभंग लिहिले. हिंदी भाषेत अभंग लिहिणारे ते पहिले मराठी संत होते. पंजाबी लोकांच्या हृदयगाभार्‍यात श्रीविठ्ठलाचे चरण उमटवणारे नामदेव महाराज म्हणजे आश्चर्यालाच आश्‍चर्य वाटावे असे लोकोत्तर संत होते.
श्रीविठ्ठलाच्या सगुण भक्तीत आयुष्यभर रममाण झालेल्या नामदेव महाराजांचा कालखंड आहे १२७०-१३५०. नामदेवांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी शके ११९२ म्हणजेच २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला आणि आषाढ त्रयोदशी शके १२७२ म्हणजेच ३ जुलै १३५० मध्ये पंढरपुरात समाधीस्थ झाले. नामदेव महाराज म्हणतात,
मरोनि जन्मावें पंढरीचें पारी ।
व्हावें महाद्वारीं कृमिकीटक ॥
संतचरणरज लागे येतां जातां ।
नामा म्हणे आतां हेचि व्हावे ॥
नामदेव महाराजांच्या मनातला हा विचार त्यांच्या सर्वच भक्तांनी त्यांच्या अस्थी राऊळाच्या महाद्वाराशी पुरून तिथेच ‘पायरी’रूपाने महाराजांची समाधी चिरंतन केली. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘नामदेवांची पायरी’ आजही वारकरी मंडळी अत्यंत आदराने आणि भक्तिप्रेमाने पुजतात. ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य महाराजांना लाभले.
नामप्रेमाचा जिव्हाळा हाच विठ्ठलभक्तीचा गाभा आहे. ‘एका नामे हरिजोडे’ ही महाराजांची भूमिका होती. नाम हेच कर्म आहे आणि नाम हेच ब्रह्म आहे हे नामदेव महाराजांचे सर्वांना स्वानुभवाधिष्ठित सांगणे होते. वारकरी संप्रदायाचा श्रीविठ्ठलभक्तीचा प्रसार नामदेव महाराजांनी अथकपणे केला. उत्तरेच्या दिशेने झेपावलेले नामदेव हे खरे तर भक्तिविश्‍वातले फार मोठे कोडे होते. आपल्या आयुष्यातली शेवटची वीस वर्षे नामदेव महाराजांनी उत्तरेकडील पंजाबात काढली आणि विठ्ठलभक्तीच्या सतारी हिंदी अभंगातून झंकारत ठेवल्या. नामदेव गाथेत महाराजांच्या दोनशे तीस हिंदी अभंगांचा समावेश केलेला आहे. शिखांच्या आदिग्रंथात म्हणजेच ‘गुरुग्रंथसाहेबा’त एकसष्ट अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासंबंधीची तपशीलवार माहिती गुरुमुखीत प्रसिद्ध झालेल्या पुरणदासकृत ‘जनमसाखी’त पाहायला मिळते. ग्रंथसाहेबातील हे एकसष्ट अभंग ‘संत नामदेव की गुरुबानी’ म्हणून प्रसिद्ध तर आहेच, परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे शीख धर्मीयांच्या नित्य पठणात ही पदे आहेत. शिखांच्या अंत:करणात नामदेवांविषयी विलक्षण आदर आहे. पंजाबमधील घुमान गावी नामदेव महाराजांचे मंदिर जे आहे ते पंजाबी आणि शिखांच्या नामदेवप्रेमाचे मूर्त साकार रूप आहे. मुसलमानांचे आक्रमण झालेले असताना शेकडो कोस दूर असणार्‍या पंजाबात वयाच्या साठीनंतर नामदेव महाराज गेले कसे? हेच सर्वात मोठे आश्‍चर्य आहे. विशेष म्हणजे उत्तरेकडील भाषा वेगळी, संस्कृती वेगळी. परंतु महाराजांनी ती आत्मसात केली. हिंदी भाषेवर वर्चस्व मिळवून अभंगरचना हिंदीमधून केली. त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त झाला की, पंजाबी संस्कृतीने महाराजांची ‘मुखबानी’ आपल्या हृदयात नंदादीपासारखी शांत तेवत ठेवली. संत कबीराने महाराजांविषयी म्हटले की,
दख्खन म्याने नामा दरजी उनोका बंदा विठ्ठल है।
और सेवा कछु नहि जाने अंदर बाहर केशव है ॥
तेराव्या - चौदाव्या शतकात दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना नामदेव महाराज चालत चालत उत्तरेकडे गेले ती खांद्यावर विठ्ठलभक्तीची पताका घेऊनच. भक्तिप्रसादाचे कार्य करताना विठ्ठलाच्या नामात महाराज तर आपले संपूर्ण अस्तित्व पार विसरूनच गेले होते. पंजाबात विठ्ठलभक्ती रुजवणारे नामदेव महाराज हे संतपुरुषांमधले फार मोठे आश्‍चर्य होते. श्रीविठ्ठलाच्या जोडीला रामनामाचे महत्त्वही महाराजांनी आपल्या हिंदी अभंगांमधून सहजपणे ओवले. आपले सद्गुरू श्री विसोबा खेचर यांच्याकडून नामदेव महाराजांना अद्वैतबोधाची दीक्षा मिळाली आणि महाराजांच्या आयुष्याला सर्वांभूती श्रीविठ्ठल दर्शनाचे अप्रतिम वळण मिळाले. ज्ञानदेवांच्या सहवासात तर ज्ञानोत्तर भक्तीची अपूर्व अमृतचव महाराजांनी प्रत्यक्ष चाखली. त्याचा परिणाम म्हणजे महाराज म्हणू लागले-
घालीन लोटांगण वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन आनंदें पुजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ॥
ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या नामदेव महाराजांनी विठ्ठलनामाची शाश्वत सुगंध लाभलेली अमृतफुले आयुष्यभर पांडुरंगावर उधळली आणि आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ या दिवशी पंढरपुरातल्या विठ्ठल राऊळाच्या महाद्वाराशीच विठुरायाच्या गजरात आपला शेवटचा भारलेला श्वास सोडला.


- वामन देशपांडे